
सातारा : प्रतिनिधी
जे लोक जरंडेश्वर कारखान्याबाबत आरोप करत आहेत. त्यांच्याविषयी मी काही बोलणार नाही. परंतु मी नियमाने वागणारा माणूस आहे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. त्याचवेळी साखर कारखान्यांचा कारभार चांगल्या विचारांच्या लोकांकडे द्यायला हवा असेही आवाहन त्यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यातील खटाव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात होणाऱ्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे.
जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात जे लोक आरोप करत आहेत त्यांच्याविषयी मला काहीही बोलायचं नाही. सगळे काही नियमानुसार चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की मी नियमाने वागणारा माणूस आहे. त्यामुळे कुणाच्या आरोपांबद्दल बोलणे उचित ठरणार नाही, असे अजित पवार यांनी नमूद केले. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांचा कारभार चांगल्या विचारांच्या लोकांकडे सोपवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीची जबाबदारी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील यांच्याकडे आहे. ते एकत्र बसून स्थानिक पातळीवर निर्णय घेतील. लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये मी निर्णय घेत असतो. त्यामुळे या बँकेच्या निवडणुकीबाबत स्थानिक पातळीवरच निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






