Site icon Aapli Baramati News

POLITICAL BREAKING : अधिवेशन संपताच अजितदादा लागले कामाला; शनिवारी सुट्टीच्या दिवशीही मंत्रालयात नागरिकांच्या पत्रांवर कार्यवाही

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगीत झालं. त्यानंतर अनेक मंत्री, आमदार आपापल्या मतदारसंघात गेल्याचं पाहायला मिळालं. अशात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी ८ वाजताच मंत्रालयात येऊन अधिवेशन काळात नागरिकांनी दिलेल्या पत्रांचा आढावा घेत आपल्या कामाला सुरुवात केली.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी रात्री उशीरा संस्थगित झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (5ऑगस्ट) सुट्टीच्या दिवशी सकाळी लवकर आठ वाजता मंत्रालयात येऊन अधिवेशनकाळात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या पत्रांचा आढावा घेतला. तसेच कार्यवाहीबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तत्पूर्वी महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे तत्पर निर्णयांसाठी, त्यांच्याकडील नस्त्यांचा तसेच कामांचा वेळेवर निपटारा करण्यासाठी ओळखले जातात. विधीमंडळ अधिवेशनकाळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी, निवेदने व पत्रे देण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती. परंतु विधीमंडळ कामकाजातील व्यस्ततेमुळे सर्वच पत्रे-निवेदनांवर कार्यवाही होऊ शकली नव्हती.

अधिवेशन संपताच, दुसऱ्या दिवशी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात येऊन सर्व प्रलंबित कामे निकाली काढली. विशेष म्हणजे आज शनिवारची सुट्टी असल्यामुळे संपूर्ण मंत्रालय रिकामं होतं. मात्र केवळ अजितदादांच्या दालनात कामाची लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळालं. या निमित्ताने अजितदादांच्या लोकाभिमुख कारभाराचा तसेच प्रशासकीय तत्परतेचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version