मुंबई : प्रतिनिधी
येत्या १८ जुलैपासून नियोजित असलेले महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधीमंडळाने याबाबत पत्रक काढून अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली असून अधिवेशन कधी होणार याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही.
संसदीय कार्य विभागाने कळविल्यानंतर अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलै २०२२ पासून सुरू होणार होते. मात्र आता हे अधिवेशन लांबणीवर पडले आहे. याबाबत कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे हे अधिवेशन कधी होणार याबद्दलही स्पष्टता नाही.
संसदीय कार्य विभागाने कळवल्यानंतर पुढची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे विधीमंडळाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, शिंदे सरकारची स्थापना होऊन १५ दिवस उलटल्यानंतरही मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आलेला नाही. त्यामुळे अधिवेशन पुढे ढकलण्याची नामुष्की शिंदे सरकारवर आली आहे.