नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रशिया युक्रेन युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. युरोपियन राष्ट्रांकडून रशियावर निर्बंध घातले आहेत. त्यामध्ये रशियाकडून होणारी कच्च्या तेलाची निर्यात थांबवली आहे. परंतु इंधन दरवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी रशियाकडून भारत कच्च्या तेलाची आयात सुरु ठेवणार आहे, असे स्पष्टीकरण अर्थमंत्री निर्मला सितरामन यांनी दिले आहे.
एकीकडे रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाकडून युरोपियन राष्ट्रांनी कच्चे तेल खरेदी करण्यासाठी नकार दिला आहे. तर दुसरीकडे भारताला स्वस्तात कच्चे तेल करण्याची ऑफर रशियाने दिली आहे. जर भारताने कच्चे तेल खरेदी केले, तर देशात भविष्यात इंधनाचे दर कमी होऊ शकतात.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत २२ मार्चपासून दहा वेळा वाढ झाली आहे. आजसुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे प्रत्येकी ८० पैशांची वाढ झाली आहे. काल इंधनाचे दर जैसे थे होते, परंतु आज पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक मेटाकुटीला आले असून केंद्र सरकार आता इंधन दर कमी करण्यासाठी काय उपाययोजना राबवणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

