
पुणे : प्रतिनिधी
काल राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. पुणे शहरामध्येही कालच्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यात ठिकठिकाणी तळी साचली. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करत ‘स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवून भाजपाने पुण्याचे वाटोळे केले’ अशी टीका केली आहे.
स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं आहे. काल सायंकाळी अतिवृष्टीमुळे भाजपशासित पुणे मनपानं पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येते. लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. मनपाला ‘अव्यवस्थेची’ कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील, असे अजित पवार यांनी या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
तूर्तास पुण्यातील जनतेला आवश्यक ती सर्व मदत करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही पाठपुरावा करतंच आहोत. जनतेनं देखील आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहनही अजित पवार यांनी केले आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ती पाऊलं उचलून स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करत असून त्याचा आढावा आम्ही घेत आहोत असे त्यांनी म्हटले आहे.