
ठाणे : प्रतिनिधी
रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या नागरिकांसाठी अतिशय तापदायक असते. प्रत्येक पावसाळ्यानंतर ही समस्या डोके वर काढते. सध्या ठाण्यामध्ये पाऊसामुळे रस्त्यांची अवस्था खराब झाली असून जागोजागी खड्डे पडले आहेत. ही परिस्थिती पाहून ठाण्याचे शिवसेना खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. ते पहाटेपर्यंत काम करतात, तर त्यांना रस्त्यावरचे खड्डे दिसत नाहीत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री ठाण्यातील ज्या रस्त्यांवरून रोज ये-जा करतात, तेथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे ठाणेकर त्रस्त आहेत. यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून नागरिक व वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. ठाण्यातील कोपरी येथे पुलावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करताना राजन विचारे यांनी “मुख्यमंत्री एकीकडे सकाळी 6 वाजेपर्यंत काम करत असतात मग त्यांना रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत का ? ” असा प्रश्न उपस्थित केला.
काही दिवसांपूर्वी रस्त्यांच्या याच दुर्दशेमुळे कोपरी पुलावर अपघात होऊन एका दुचाकीस्वाराला जीवही गमावावा लागला होता. या अपघातामुळे कोपरी पुलाच्या नवीनच झालेल्या बांधकामावर देखील प्रश्नचिन्ह तयार झाले आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर अरुंद मार्गिका असल्याने येथे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यातील पहिल्या टप्प्यातील काम होऊन लोकार्पण सोहळा देखील पार पडला आहे. या मार्गिका आता खुल्या झाल्या आहेत. परंतु, दुसऱ्या टप्प्यातील काम संथ गतीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राजन विचारे यांनी एमएमआरडीए च्या अधिकाऱ्यांना वेगाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.






