मुंबई : प्रतिनिधी
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी अनेक राज्यांमध्ये पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. तृणमूलने त्रिपुरात प्रचाराचा वेग वाढवला आहे, तर गोवा आणि उत्तर प्रदेशात पक्षाच्या हालचालीतही वाढ झाली आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल केवळ पश्चिम बंगालपुरते मर्यादित राहणार नाही, असा स्पष्ट संदेश ममता बॅनर्जी यांनी गेल्या काही महिन्यांत दिला आहे. या अनुषंगाने त्यांची शरद पवारांसोबतची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीचा संदर्भ देत महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी काँग्रेसशिवाय एकजूट विरोधी पक्ष शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
ममता दीदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, त्या पवारसाहेबांना भेटणार आहेत. बैठकीनंतर त्या पत्रकारांना संबोधित करून चर्चेची माहिती देतील, असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे. टीएमसी या क्षणी काँग्रेसला बाजूला करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या प्रश्नावर नवाब मालिक म्हणाले, तृणमूल पश्चिम बंगालच्या बाहेर आपला पाया स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक पक्षाला हा अधिकार आहे. पण काँग्रेसला बाहेर ठेऊन भाजपच्या विरोधात एकसंध विरोधक उभारणे हे जवळपास अशक्य काम आहे.
राष्ट्रवादीचे नेते मलिक यांनी ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्या भेटीचे वर्णन सामान्य भेटीसारखे केले असेल, परंतु तृणमूलने भाजपला आव्हान देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. अलीकडे काँग्रेस आणि तृणमूल यांच्यात जोरदार वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते तृणमूलमध्ये सामील झाल्याच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेदही झाले आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी उघडपणे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उभी आहे. अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवा राजकीय ‘गेम’ पहायला मिळण्याची शक्यता आहे.

