
मुंबई : प्रतिनिधी
गेली दोन वर्ष विरोधक आघाडी सरकार जाण्याच्या वेगवेगळ्या तारखा देत आहेत. मात्र नारायण राणे यांनी मार्च ही जास्तच मुदत दिली त्याबद्दल नारायण राणे यांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आभार मानले आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आघाडी सरकार मार्चपर्यंत जाणार असे भाकीत केले आहे. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्या भाकीताची खिल्ली उडवली आहे. आतापर्यंत भाजपच्या नेत्यांनी पाच – सहा वेळा वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत. लोकांना आशेवर ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे हे मी समजू शकतो असा टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला आहे.
मुळात गेल्या दोन वर्षांपासून हे सरकार पडणार असे सांगितले जात आहे. मात्र त्यांचा पक्ष टिकवायचा असेल तर अशी आश्वासने व असं वातावरण कायम ठेवावं लागतं अशी टीकाही जयंत पाटील यांनी यावेळी केली. वेळोवेळी कार्यकर्त्यांना अशी आश्वासने देतानाच आता मार्च महिन्याची मुदत दिली आहे. ही मुदत जरा जास्तच वाटते, त्याबद्दल राणे यांचे आभार अशा शब्दांत जयंत पाटील यांनी त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.
भाजपचं सरकार नसल्यामुळे राज्यात अनागोंदी कारभार सुरू आहे. मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. राज्यातील मविआ सरकार फार काळ टिकणार नाही, असे विधान नारायण राणे यांनी केले होते. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे.






