
मुंबई : प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील लखीमपुर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र सरकारकडून राज्यात बंद पुकारण्यात आला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या बंदवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अशातच अमृता फडणवीस यांनीही या बंदविरोधात आज वसुली बंद आहे का ? असे ट्विट केले आहे. या ट्विटवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमृता फडणवीस आमच्या सुनबाई आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, असे प्रत्युत्तर दिले आहे.
राज्य सरकारने पुकारलेल्या या बंदला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र भाजपाकडून या अनेक ठिकाणी बंदला पूर्णपणे विरोध केला. देवेंद्र फडणवीस यांनी या बंदवर कडाडून टीका केली आहे. त्यांनी या बंदला जालियनवाला बाग हत्याकांड असल्याचे म्हटले आहे. अशातच अमृता फडणवीस यांनीदेखील या बंदला विरोध दर्शवला आहे. त्यांनी राज्य सरकार विरोधात ट्विट करत, आज वसुली बंद आहे का ? असा प्रश्न केला आहे.
नाना पटोले यांनी या ट्विटला प्रत्युत्तर देताना, देवेंद्र फडणवीस हे आमच्याहून लहान आहे. त्यामुळे अमृता फडणवीस या आमच्या सुनबाई आहेत. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही, असे सांगत याबद्दल जास्त बोलणे टाळले.






