
मुंबई : प्रतिनिधी
भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत लोकशाहीला वाचवणारा व ऐतिहासिक निकाल असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या विधानाला शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट करत अध्यक्ष महोदय, याच महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून १२ आमदारांची नियुक्ती होत नाही; यावरही आवाज उठवा असे प्रत्युत्तर दिले आहे.
उर्मिला मातोंडकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, अभिनंदन आहे..! लोकशाही वाचली. अध्यक्ष महोदय, याच महाराष्ट्रमध्ये गेल्या एक वर्षापासून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती होत नाही. यावरही आवाज उठवा. त्यावरही शोभेकरिता का होईना काहीतरी आवाज उठवा. इथे केवळ ५० लाख नाहीतर १२ कोटी जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत लोकशाहीला वाचवणारा व ऐतिहासिक निकाल आहे. आज लोकशाहीचे संरक्षण झाले. हा केवळ १२ निलंबित झालेले आमदारांचा प्रश्न नव्हता. तर त्यांच्या मतदारसंघातील ५० लाखाहून अधिक मतदारांचा प्रश्न होता, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर दिली आहे.






