
सांगली : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी गावात जाऊन पूरस्थितीची पाहणी केली. येथील निवारा केंद्राला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांनी पूरस्थितीची माहिती घेत त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
पश्चिम महाराष्ट्रात उदभवलेल्या पूरस्थितीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सांगली, साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी खराब हवामानामुळे कोल्हापूर दौरा रद्द केल्यानंतर ना. अजित पवार हे थेट सांगलीकडे रवाना झाले. पलूस तालुक्यातील भिलवडी या पूरग्रस्त गावात जाऊन त्यांनी संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी विविध सूचना करत पूरग्रस्तांना मदतीत हयगय करू नका असेही निर्देश त्यांनी दिले.
पुरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पुरग्रस्तांना ठेवण्यात आलेल्या निवारा केंद्राला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पुरग्रस्तांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. पुरग्रस्तांच्या राहण्याची, जेवण्याची सोय कशी आहे ? याची त्यांच्याकडून माहिती घेतली. भिलवडी परिसरातील ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना वारंवार पुराचा फटका बसतो अशा घरांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
वारंवार पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंचावरील जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासण्याचे आदेशही त्यांनी उपस्थित असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. भिलवडी गावातील पुरग्रस्तांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी चांगला मार्ग काढण्याचे आश्वासन देत संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरीकाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
भिलवडी बाजारपेठेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बोटीतून पाहणी
भिलवडी (ता. पलूस, जि. सांगली) येथील बाजारपेठ पुर्णपणे पाण्याखाली आहे, पाणी भरलेल्या बाजारपेठेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोटीतून जाऊन पाहणी केली. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी ना. पवार यांनी येथील नागरीक आणि व्यावसायिकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या.






