Site icon Aapli Baramati News

सोलापूर : पालकमंत्री बदलाच्या चर्चेला विराम..? काय म्हणाले जयंत पाटील

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

उजनी धरणातून पाच टिएमसी पाणी इंदापूरला देण्याच्या निर्णयावरून झालेल्या गदारोळानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला. परंतु त्यानंतर सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना बदलले जाणार अशा चर्चा रंगत होत्या. त्यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण देत दत्तात्रय भरणे हेच सोलापूरचे पालकमंत्री राहतील असे सांगितले आहे.

उजनी धरणातून इंदापूरला पाच टिएमसी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात विविध संघटना, पक्षांकडून या निर्णयाला विरोध दर्शवत आंदोलने करण्यात आली. त्यामुळे राज्य शासनाला इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय  रद्द करावा लागला. हा गदारोळ थांबल्यानंतर पालकमंत्री बदलण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दत्तात्रय भरणे यांचे पालकमंत्रीपद काढून घेऊन अन्य मंत्र्यांकडे दिले जाणार अशा चर्चा झडत होत्या.

आज पुण्यात  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार,  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे आदी नेते उपस्थित होते.  या बैठकीदरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही  शरद पवार यांची भेट घेतली.

सोलापूरकरांनी उजनीचे पाणी इंदापूरला देण्यास विरोध केल्यानंतर हा निर्णय रद्द झाला आहे. त्यामुळे आज झालेल्या बैठकीत पक्ष संघटना आणि विकासकामांबाबत चर्चा झाल्याची माहिती देऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूरच्या पालकमंत्री बदलाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. दत्तात्रय भरणे हेच सोलापूरचे पालकमंत्री म्हणून काम पाहतील, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.  


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version