
बारामती : प्रतिनिधी
माळेगाव सहकारी साखर कारखान्याने रेकॉर्ड ब्रेक गाळप केले आहे. यावर्षी पहिल्यांदाच १२ लाख टन ऊसाचे गाळप करत कारखान्याने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मागील वर्षी कारखान्यात झालेल्या सत्ता बदलानंतर पुन्हा एकदा कारखाना रुळावर आला असून व्यवस्थापनातील बारकावे लक्षात घेऊन कामकाज सुरू केल्याने कारखान्याने विक्रम प्रस्थापित केल्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी सांगितले.
माळेगाव कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम यशस्वीपणे सुरू आहे. यावर्षी संचालक मंडळाने केलेल्या योग नियोजनामुळे आतापर्यंत तब्बल १२ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात यश आले आहे. नवीन संचालक मंडळाकडून ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनात अधिकाधिक पारदर्शकपणा, त्याचबरोबर कामकाजाचे काटेकोर नियोजन केले जात असल्याचे बाळासाहेब तावरे यांनी यावेळी सांगितले.
कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी घेतलेले परिश्रम आणि योग्य नियोजन यामुळे कारखाना सुरळीत सुरू असल्याचेही तावरे यांनी नमूद केले. माळेगाव साखर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात उस गाळप झाले आहे. त्यामुळे सभासदांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.






