बारामती : प्रतिनिधी
कर्नाटक राज्यातील एक मोठे उद्योजक भीमा-पाटस सहकारी चालवायला घेत आहेत. त्यामुळे या कारखान्याची गाळप क्षमता वाढणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान, बाहेरील उद्योजकांनी कारखाना चालवायला घेतला तर टिका होत नाही. मात्र स्थानिकांनी कारखाने चालवल्यावर टिका होते अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
सोमेश्वर येथे आयोजित एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. पुणे जिल्हा बॅंकेकडे भीमा-पाटस कारखान्यावरील कर्जाची एकरकमी परतफेड संबंधित कारखानदार करत आहे. तो कर्नाटक येथे चार ते पाच कारखान्यांवर रोज ६५ हजार टन ऊस गाळप करत आहे. हा कारखाना दुप्पट क्षमतेने गाळप करत आहे. त्यामुळे बंद पडलेल्या या कारखान्याला दिलासा मिळणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
जर परराज्यातील व्यवसायिकांनी कारखाना चालवायला घेतला, तर त्यांचे कौतुक होते. परंतु आपल्याच राज्यातील लोकांनी कारखाना चालवायला घेतला तर त्यांच्यावर टीका होते, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

