
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील थोपटेवाडी येथील उंबरचारी ते सरकारी विहीर या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ऊस वाहतुकीची अडचण झाली होती. मात्र आता हे काम मार्गी लागल्यानंतर शेतकऱ्यांची अडचण दूर होणार आहे.
थोपटेवाडीतील उंबरचारी ते सरकारी विहिर या रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून दुरवस्था झाली होती. परिसरातील शेतकऱ्यांच्या ऊस वाहतुकीसाठी हा एकमेव महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या रस्त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसुविधा योजनेमधून १७ लाख रुपयांचा निधी दिला असून या रस्त्याच्या सुधारीकरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या ऊस वाहतुकीचा प्रश्न मिटणार आहे.
यावेळी सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक सुनील भगत व सरपंच रेखा बनकर, उपसरपंच कल्याण गावडे, अजित विकास सोसायटीचे अध्यक्ष नानासो थोपटे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.