
बारामती : प्रतिनिधी
गौतमीचा कार्यक्रम आणि प्रेक्षकांचा राडा ही गोष्ट ठरलेलीच आहे.. ग्रामीण भागासह शहरातही गौतमी पाटीलची क्रेझ पाहायला मिळते. बारामती तालुक्यातील झारगडवाडीतही नुकताच गौतमीचा कार्यक्रम शांततेत आणि सुरळीतपणे पार पडला. त्यावर तिने आयोजकांचं कौतुक तर केलंच, मात्र इतरत्र होणाऱ्या कार्यक्रमांना टार्गेट केलं जात असल्यामुळे राडा होत असल्याचंही सांगायला ती विसरली नाही.
बारामती तालुक्यातील झारगडवाडीत पार्थ पवार फाउंडेशनच्या वतीने दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान गौतमी पाटीलचाही कार्यक्रम पार पडला. अतिशय नियोजनबद्धरित्या आणि शांततेत हा कार्यक्रम पार पडला. हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिलेल्या प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. निर्विघ्नपणे कार्यक्रम पार पडल्यामुळे गौतमीलाही समाधान वाटलं. त्यावरच तिने माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.
आयोजकांच्या नियोजनाचे कौतुक करत मला कार्यक्रम आवडल्याची प्रतिक्रिया गौतमी पाटीलने माध्यमांशी बोलताना दिली. झारगडवाडीत पार्थ पवार युथ फाउंडेशनच्या वतीने दहीहंडीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे आयोजन खूपच उत्तमरित्या करण्यात आलं होतं. योग्य नियोजन आणि शिस्तीमुळे या कार्यक्रमात मला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. उपस्थितांनीही कोणत्याही प्रकारचा गोंधळ न घातल्यामुळे कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडल्याचे गौतमीने म्हटले आहे.
माझा कार्यक्रम आणि गोंधळ किंवा राडा असं गणित मांडलं जातं. मात्र प्रत्येकवेळी असं होईलच असं नाही. आजवर काही अपवाद वगळता माझे कार्यक्रम चांगलेच झालेत. परंतु माझ्या कार्यक्रमाला काहीवेळा टार्गेट केलं जातं. त्यातच अशा राड्यामुळे त्याला अधिक खतपाणी घातलं जातं. पण प्रत्येक ठिकाणी असं होईलच असं नाही असंही गौतमीनं स्पष्ट केलं.






